Wednesday, November 08, 2006

मोठ्ठं होताना

खरंतर हे लिखाण आहे काही वर्षांपूर्वीचं. जेव्हा मोठं होण्यासाठी अगदी प्रथम घर सोडलं तेव्हाचं!
पण अलीकडे वाचताना लक्षात आलं की मोठ्ठं होण्याच्या या न संपणारया वाटेवर अजूनही असंच वाटतं की...
---------------------------------
असं वाटतं या कोषातून बाहेर पडूच नये कधी
लहान आहे ते लहानच राहावं
आईच्या पदराचा धुवट वास अनुभवत निवांत पडून राहावं...
पोटाशी पाय घेउन,गुरफतून तिच्या मायेत.
पण का बरं मोठं हे प्रत्येकाला व्हावंच लागतं?
आणि मग पंख पसरून घरट्याबाहेर उडायला लागतं?

घरटं सोडावं वाटत तर नाही
आणि नव्या क्षितीजांचे नवे विस्तार त्यांच्याकडेही पाठ करवत नाही.
दूरदेशी उडताना नवे प्रांत माणसे नवी
नवनव्या प्रवाहातून नकळत मिळणारी दिशा नवी.
नव्या दिशेने वाटचाल थोडी अडखळत, धडपडत...
एकदा ठेच लागल्यावर आपलं आपणच सांभाळत

जिथे बोट धरून चालवायला शेजारी कोणीच नसतं...
उचललेलं पाऊल बरोबर आहे?
आपलं आपल्यालाच माहीत नसतं
नेहमी सावलीतूनच चालायची सवय असणारी पाऊलं,
उन्हं लागली तरी माहीत असायचे त्यांना सावल्यांचे पत्ते.
नव्या जागच्या सावल्याही अनोळखी ... परक्या...
मुकाटपणे त्यांना मग सोसावे लागतात चटके.
चटकेच मग अचानक मोठं करून जातात
चारचौघात 'मोठेपणा' बाळगायला शिकवतात.

मोठेपणाचं कवच बाहेर मिरवता येतं
एकटं असताना मात्र आतून वाटत राहातं...
नकोच हे मोठेपण...या जबाबदारया...
हे मोठ्या जगाकडे डोळे उघडून बघणं
आणि दिपलेल्या डोळ्यांनी मोठ्या वर्तूळात फिरणं
नको घ्यायला ऐकून व्यवहाराचं बोलणं
पावलोपावली 'आपल्या' विश्वातलं अंतर वाढत जाणं
कारण परत हे अंतर पार नाही होणार
छोटंसं जग आधीचं आता पलीकडेच राहणार
पण मग परत जावं वाटलं तर काय बरं करायचं
परतीच्या वाटेवर परत मागे फिरायचं?
पण आम्ही धीराचे शिलेदार मागे कसे जाणार...
आम्ही असेच शब्दातनं जूनं विश्व अनुभवणार...
आता आम्ही मोठे झालो म्हणून बालपण संपलं म्हणणार

पाहा आम्ही सहजी एकटे चालू शकतो
एवढं सगळं धीरानं समजून सांगून शकतो-
- स्व:तला आणि दुसरयालाही...
पण या मोठ्या गप्पा मारल्या तरी-

बालपणीच्या गोष्टीतला
शेणामेणाच्या घरट्यातला
चिमणा पक्षी गुणगुणतोच...
का बरं मोठं हे प्रत्येकाला व्हावं लागतं..
आणि मग पंख पसरून घरट्याबाहेर उडायला लागतं...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Thursday, October 19, 2006

cookies आणि भिकारी

काल आम्ही चौघी ऑफिसनंतर दिवाळी शॉपिंगला गेलो होतो.
काहीच नाही आवडलं तसं मी आणि राधिका बाहेर येऊन थांबलो.
तर समोर प्रसिध्द 'cookie man' चा स्टॉल. खाल्ल्या मग. एक cookie रु.२५ फक्त. एकूण १०० रुपयाच्या खाल्ल्या.
मी राधिकाला म्हणलं पण. आईला कळलं तर म्हणेल, १०० रुपयाची बिस्कीटं गं कसली खाता? आहे म्हणून हे असे उधळायचे का? पेक्षा सत्कारणी लावा.

घरी परत येताना गाडी सिग्नलला थांबली. नेहमीसारखी १-२ छोटी पोरं खिडकीच्या काचेवर टकटक करू लागली.
ताई भूक! मीदेखील नेहमीसारखंच दुर्लक्ष केलं. पुढे जा...

रात्री दिवसाचा पाढा वाचताना सुहासला म्हणलं, अरे ते 'cookie man' पुण्यात आलंय, अमूक mall मधे. काय सही cookies आहेत. १०० रुपयाच्या खाल्ल्या.

आणि आजकाल भिकारी पण किती झालेत ना सिग्नलला !


- सोनाली सुहास बेंद्रे 

Thursday, October 05, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी

आदित्यने मला ह्या खेळात सामील करुन घेतले. खेळाविषयी अधिक माहितीकरिता
http://marathisahitya.blogspot.com/2006/05/blog-post.html

१.सध्या वाचनात असलेले/शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक
~ ‘गोंदवलेकर महाराजांची प्रवचने’ – गोंदवलेकर महाराज

२. वाचले असल्यास त्याबद्द्ल थोडी माहिती.

~ प्रवचनं म्हणलं तर कदाचित तुम्हाला ‘कंटाळवाणं’ काहीतरी असं वाटू शकेल. पण हे पुस्तक प्रवचनापेक्षा खूप अधिक काहीतरी देते जे समजायला, पचायला खूप सोपं असतं. हे पुस्तक रोज एक पान याप्रमाणे वर्षभर वाचून आचरणात आणण्यासाठी आहे. अप्रतिम लेखनशैली, अतिशय सोपी भाषा आणि नित्य व्यवहारातली साधी उदाहरणे यामुळे नामस्मरणासारखा विषयही सहजसुंदर आणि कृतीस उद्युक्त करणारा झाला आहे.

३. अतिशय आवडणारी /प्रभाव पाडणारी ५ पुस्तके.

~ ‘जावे त्यांच्या देशा’ – पु.ल. देशपांडे
~ ‘आहे मनोहर तरी’-सुनिताबाई देशपांडे
~ ‘नॉट विदाउट माय डॉटर’ –
~ ‘विदेश’

४. अद्याप वाचायची आहेत अशी ५ मराठी पुस्तके
~ सगळीच …

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे
~ मला ‘जावे त्यांच्या देशा’ हे पु.लं. चं पुस्तक अतिशय आवडतं. सर्वाधिकवेळा वाचण्याबरोबरच मी हे पुस्तक अनेकदा भेटीदाखलही दिलेलं आहे. हे पुस्तक वाचताना आपण ते प्रत्यक्ष जगतोय असं वाटतं. त्यातली पात्रं आपण जगतो किंवा ती आपल्या सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेत इतकी फिट्ट बसतात की दोन देशांमधलं अंतर … राजकीय सीमा हे काहीच मध्ये येत नाही. मला वाटतं ... याच गोष्टी या पुस्तकाशी कायमचं बांधून ठेवतात.

ह्या खेळात सहभागी व्हायला मी ह्यांना निमंत्रित करते
अभिजीत बाठे
नंदन

Sunday, September 17, 2006

आक्कात्ती

आज तू नसलेलं तुझंच घर मी आतबाहेर पाहिलं,
आणि परत एकदा जाणवलं...की आता तू नाहीस, परतून येणारही नाहीस.
काही व्यक्ती, काही जागा, त्यांचं आपल्यात असणं,
का आपण त्यांच्यात जगणं, हे इतकं सवयीचं असतं,
की रिकाम्या जागा मनास पटतंच नाहीत
आणि त्या कोणी भराव्यात असं वाटतही नाही.

खरंतर आता आम्ही लहान नाही...
आमच्या मुलांची पणजी होऊन तृप्त झालेल्या तुझ्या आठवणी मात्र खूप जुन्या...
सोमवारातल्या घरात, मधल्या खोलीतल्या, पाटीवरच्या गणितांच्या आणि तुझ्या हातातल्या पट्टीच्या!
मग भाईची आणि माझी धडपड...गणितं सुटायला हवीत. कारण समोर हातात पट्टी धरलेली तू ... आमची आजी!
मग एक दोन पट्ट्या आणि पाटी भरून गणितं झाली की कळवळलेली तू हातावर ५० पैसे दयायचीस आणि मी आणि भाई पार अपोलो टॉकीजच्या कुल्फ़ीवाल्याकडं धूम ठोकायचो.
गणपतीत तर तुला कोण हौस. ढीगभर नातवंडं गोळा करायची, गणपती दाखवण्याची आणि खाऊ-पिऊ घालण्याची.
खरंतर तुला सगळंच फिरून पाहण्याची, उपभोगण्याची फार आवड. आम्हा कॉलेजात जाणारया नातींना तू नेहमी
म्हणायचीस...जरा मलापण न्या गं तुळशीबागेत. नवीन पध्द्त्तीच्या टिकल्या, माळा, पाहायला, फिरायला.
पण आम्ही आमच्याच तालात...धुंदीत!
कधी म्हणायचीस, अगं आवरा जरा...पावडर कुंकू करावं...मुलीच्या जातीनं कसं नीट-नेटकं राहावं.
हे काय राहाणं? केसांना तेलाचा हात नाही...फ़िरतात गावभर तशाच. जरा ये एक दिवस,खसखसून न्हायला घालते.

दिवाळी आली की तुझी कोण गडबड. माझ्या दारात रांगोळी काढा गं...रंग भरा गं...
दारात खुर्ची टाकून पाहात बसायचीस. पण आम्ही हळूच सटकायचो...काहीतरी थातूर-मातूर कारणं काढून.
मग बोलणी...काय पोरी आहेत...आगाऊ नुस्त्या...जरा चार बोटं काढतील तर ... पण नाही!
हे ऐकायला आम्ही जागेवर तर हवं!
पण हेच नमस्काराला मात्र पुढे...हात पसरून! तेव्हा मात्र हातावर पैसे ठेवणारी, कानशिलावर मायेची बोटं मोडणारी, आणि आवर्जून सगळ्यांची, अगदी घरादारासकट द्र्ष्ट काढणारी....ती तूच...आमची आजी.

... पण आताशा फार थकली होतीस गं.
आम्हा सर्वांची लग्नं, संसार, मुलंबाळं, आमच्या तारुण्याच्या जोमात तुमची झपाट्यानं सुरकुतणारी पिढी आम्हाला 'दिसायची' तर खरं...पण 'लक्ष' दयायला वेळ नाही व्हायचा.
आम्ही आमच्यातच मग्न. आमचा जॉब, आमची कामं, आमची घरं ... परदेश वारया...
तुला मात्र कोण अभिमान...नातवंडांचा, सुना-जावयांचा. येणारया-जाणारयाला कौतुकानं सांगायचीस...फारिनला जाऊन आलीये. आणि मग कोपरयात घेऊन मला हळूच विचारायचीस ... कागं, पगार तर बरा मिळतो ना...?

संध्याकाळ झाली की तू थांबत-थांबत का होईना २ जिने चढणार, आणि पणतवंडांच्यात येऊन बसणार. भेटलं की ओरडणार, भेटायला येऊ नका...आम्ही वर गेलो की मग या!!
पण आमच्या व्यापात आम्ही गर्क. तू मात्र परत परत म्हणायचीस ... अगं भेटा गं. जरा आलं की ५ मिनिटं तरी.
मग आम्ही कधीतरी ५ मिनिटं तोंड दाखवायला यायचो. म्हणायचीस, बास आता... जागा रिकामी करायला हवी ... तर आम्ही हसण्यावारी न्यायचो.

पण दवाखान्यात तुला पाहिलं आणि मनचं हललं गं! कमालीचं थकलेलं शरीर आणि जाणिवेच्या अलीकडं-पलीकडं घोटाळणारं तुझं मन!
चिऊ-काऊच्या घासासारखं बोलण्यात गुंगवून तुला बळेच भरवताना जाणवली ती तुझी अनिच्छा, तुझ्या वेदना, आणि एक अलिप्तता...?

... आणि मग २-३ दिवसात समजलं की तू नाहीस.

दु:खाच्याहीवर पश्चात्तापाची भावना मन व्यापून गेली.

आज तू नसलेल्या तुझ्या घरात प्रत्येक गोष्ट पोरकी वाटली.
तुझी पुस्तकं ... तुझे देव... रांगेत मांडलेले तुझे जिवा-भावाचे पितळी डबे आणि तुला मीच रंगवून दिलेला मोठा श्रीकृष्णही!

तुझ्या नावाच्या दिव्याजवळ तास-दोन तास बसताना वाटलं ... हा वेळ तेव्हा झाला असता तर ...? कारण तुला आमचा फक्त वेळच तर हवा होता!!


- सोनाली सुहास बेंद्रे 

Friday, May 05, 2006

आंबा

आंबा म्हणले की आठवतो तो त्याचा मऊसूद केशरी रंग ... स्वत:तच मग्न असलेला आकार ... आणि उन्हाळा संपला तरी वर्षभर मागे रेंगाळणारी ती सुगंधीत चव.

एप्रिल महिन्याच्या तोंडाशी बाजारात जावं. तो चिरपरिचीत गोड वास हळूहळू वातावरणात भरू पाहात असतो.
'कसा दिला...?'
'काय फळ आहे पाहा तर खरं...'
'अस्सल रत्नागिरी आहे ताई ... '
'खराब निघाला तर तस्सा परत आणीन ...'
असे ठेवणीतले संवाद कानावर पडायला लागतात. आणि जशी काही बाजारात द्वाही फ़िरते...'आंबा आला'.

उन्हाचा कडाका वाढतो. मुलांचे परीक्षांचे निकाल लागून कानात वारं घुसल्यासारखे त्यांचे हुंदडणे सुरू होते. घराघरात कुठे कोठीच्या खोलीत, तर कुठे खाटेखाली पोते पांघरून गुपचूप एका रांगेत मांडलेले आंबे बाळगोपाळांना खुणावू लागतात. मग कुठे आईचा डोळा चुकवून किंवा दुपारी सगळे झोपल्यावर आंबा पळवून खाण्याचे उद्योग सुरू होतात.
खरेतर आंबा म्हणले की त्याच्याशी जोडलेल्या बालपणीच्या अशा कितीतरी आठवणी ताज्या होतात.

मला आठवते ... आमच्या प्राथमिक शाळकरी दिवसात आमची आई जास्त करून रायवळ, गोटीच आणायची. जास्तीत जास्त लाड म्हणजे पायरी. हापूस हा क्वचितच आणि तोही पाहुण्यांच्या निमित्ताने मिळायचा.

उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि आंब्यांचा मोसम सुरु झाला की मी आणि भाऊ, आमची अगदी गडबड सुरू व्हायची.
'आई ... आंबे कधी आणायचे? गल्लीत अमक्याकडे आणलेपण...'
शेवटी आमच्या रोजच्या कटकटीला वैतागून आई एकदाची म्हणायची, 'चला आणूया.'

तर तो सोन्याचा ... नव्हे आंब्याचा दिवस एकदाचा उगवायचा. सकाळी १० ते १०-३० ला बागेकडे भरणारया बाजारात जायला मी आणि भाऊ तयार व्हायचो. अशावेळी गल्लीतले खेळ, बाकी कुठलीही आमिषं, आणि मुख्य म्हणजे आपापसातली भांडणं सारं विसरून एकजुटीने आम्ही दोघे सर्वतोपरी आईला मदत करायचो. एकजण घरातली शक्य तेवढी मोठी पिशवी शोधून तर दुसरा आईला 'पुरेसे पैसे घेतलेत ना...' वगैरे खात्री करत, आईला पूर्ण भाव देत असे आम्ही बाजारात जायला निघायचो. आईदेखिल या दिवसात आमच्याकडून सुट्टीतला अभ्यास, अभ्यासाचे कप्पे आवरणं, कपडे घडी करणे वगैरे कामे करून घ्यायची.

बाजारात पोहोचले की खरी धमाल सुरू व्हायची. आई आधी भाजीपासून सुरुवात करायची. एरवी भाजीखरेदी च्या बाबतीत कटकट करणारे आम्ही तेव्हा मुकाट्याने आईच्या पाठीशी राहायचो. दगडाखाली हात असणे या परीक्षेत न समजलेल्या वाकप्रचाराचा अर्थ आता मात्र आम्हाला नीट उमजायचा. एक डोळा आंब्यांच्या हातगाड्यांकडे ठेवून आम्ही भाजीखरेदी करणारया आईच्या मागे-मागे फिरायचो. एरवी गर्दीत आम्ही हरवू याची काळजी घेणारया आईला आम्ही तिची पाठ सोडणार नाही याची अगदी खात्री असायची.
तोवर गल्लीतले कोणी दोस्त मंडळ आपल्या आयांबरोबर जर भेटले तर भाऊ त्यांना तत्परतेनं सांगायचा 'आम्ही आंबे घ्यायला आलोय.' मग आम्ही दोघे आगाऊपणाने आंब्याचे भावपण विचारून यायचो. शेवटी एकदाचा एक आंबेवाला गाठून भाव करणे चालू व्हायचे. आईच्या दृष्टीने सगळेच आंबेवाले भाव जास्त सांगत असायचे. तर आम्हाला वाटायचं - काय ही आई? एवढं स्वस्त कोणी देईल का? जशी आई भाव विचारून पुढे पुढे जायची तशी आमची सहनशक्ती संपत जायची. भाऊ आणि मी एरवी दुश्मन, पण तेव्हा मात्र हातात हात घालून एकमेकांकड़े केविलवाणे पाहायचो.
'आई, अगं घे ना...किती कमी करतोय तो...' आम्ही अगदी टेकीला आलेलो असायचो.
'तुम्ही गप्प बसा...पुढे बघू...आणि मधे-मधे बोलू नका' - आई आमच्या सहनशीलतेवर अज़ून एक घाव घालायची.

आम्हाला मनातून प्रचंड भिती वाटायची की आईनं आंबे घेतलेच नाहीत तर... या विचारासरशी सारी सुट्टीच व्यर्थ वाटू लागायची.

शेवटी एकदाचे हव्या त्या भावात आई आंबे मिळवायचीच. आम्हा भावंडांचा जीव एकदाचा आंब्यात पडायचा. माझी आणि भावाची आता ती टोपली उचलण्याची धावपळ चालू व्हायची. आम्हा दोघांना बाजूला सारून शेवटी ते गोड ओझं आईच उचलायची. आम्ही महाराजांच्या भालदार-चोपदारा सारखे पुढे-मागे चालत घरी यायचो.

तर असे एकदाचे आमच्या घरात आंबे यायचे. आईने घरात पाऊल टाकून टोपली खाली ठेवली की लगेच आम्ही खायच्या तयारीला लागायचो.
पण आई हातातून आंबा काढून आधी देवापुढे ठेवायची. देवाला दिवा लावायची, हात जोडायची आणि प्रार्थना म्हणायची.
आमचं लक्ष्य मात्र आंबा हेच असायचं. 'जोडा हात ... लक्ष कुठयं?' आई ओरडायची.

आंब्याचा रस काढणे हादेखील एक मोठासा कार्यक्रमच असायचा.

सुट्टीला गावी आजीकडे गेलो की मामा पोत्यातून शेकड्यावर आंबे आणायचा. आजी मोठ्ठ्सं पातेलं समोर घेऊन आंबे पिळायला बसायची. आम्ही मामे-मावस भावंडं तिच्याभोवती गोलाकार बसायचो. आंब्याचा रस काढला की त्याची कोय आजी एकेकाला चोखायला दयायची. आम्ही सर्व आशाळभूतासारखे आपल्याला कोय कधी मिळणार याची वाट बघत बसायचो.

दुपारी भरपूर रस ओरपून, परत संध्याकाळचं ओटीवर बसून गोटी आंबे चोखणे आणि साली पलीकडच्या वाड्यात फेकणे अशी सगळी रसाळ सुट्टी असायची. पण तरीही आजी रस काढायला बसली की त्या कोयींमध्ये मात्र जीव अडकायचाच.

आता बाजारात आंबा आला की लगेच घरात टेबलवर पण येतो. रायवळ, गोटी सोडा, पायरीपण आणला जात नाही. हापूस शिवाय आमचं जसं पानच हलत नाही.

तरीही दरवर्षी पहिला आंबा आणला की आठवणीतला हा आंबा नव्यानं मोहोरतो. आपल्या मुलांसाठी आंबा आणताना बालपणीतला हा आंबा हळूच खुणावतो. बालपणाची आणि आंब्यातल्या भागीदार भावाची आवर्जून आठवण येते.

बालपणातला तो रायवळ ... ते चोखताना कोपरयापर्यंत गेलेले ओघळ ... आम्हाला 'आंब्यावर बसलेत अगदी' म्हणून ओरडणारी आई ... आठवणीतला तो आंबा अधिक मधूर वाटतो. वर्षागणिक त्याची रसाळ गोडी जशी वाढतच जाते.

- सोनाली सुहास बेंद्रे 

Tuesday, February 28, 2006

क्षण

घट्ट मिटल्या मुठीमधले काही क्षण वेचलेले
काही निसटले, सांडलेले, दूर मागे राहिलेले

'अभिनव'च्या रंगांमधले कुंचल्यातून आकारणारे
कपांवरच्या वाफेवरती शब्दांसवे तरंगणारे

कल्पनांच्या वाटेवरचे सृजनोत्सवात जागलेले
मोरपंखी दिवसांमधले मैत्रच होऊन राहिलेले

काही क्षण हातावरच्या मेंदीत रंगून गेलेले
अक्षतांसवे उधळताना हिरवे हिरवे किणकिणले

मिळून पाहिल्या स्वप्नांचे, संकल्पांचे, आकांक्षांचे
कष्टसाध्य आनंदाचे घामामधूनी ओथंबले

आस लावूनी वाट पाहिली ते क्षण माझ्या कुशीत फुलले
दिसामाशी जे मोठे होऊन आनंदाचे निधान झाले

चिऊकाऊच्या गोष्टींमधले चांदोबाच्या वाडीमधले
चिमण्या बोलांमध्ये गुंतूनी माझ्या घरटी विसावले

मागे पाहता वळूनी कैकदा वाटे क्षण ते पकडावे
बंद मखमली पेटीमध्ये हळूच जपावे सजवावे

येतील क्षण संघर्षाचे, थकलेले, गेले दमूनी
पेटीतल्या या क्षण ठेव्यांची करूनी मग ती संजीवनी
अनुभवल्या त्या पूर्वक्षणांची परतूनी जादू अनुभवावी
थकलेल्या तनूमनास व्यापून नवी उभारी मिळवावी...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Wednesday, February 15, 2006

बालसंगोपनाचे तीन प्रसंग

कृष्णा आणि यश दिवसभर एकत्रच असतात ... आजीकडे.
यश म्हणजे माझा भाचा .. वय वर्षं तीन
आणि कृष्णा म्हणजे माझी कन्या .. वय वर्षं दीड.
यशला रामायण अगदी तोंडपाठ आहे. म्हणजे जर त्याला कोणीही राम या विषयावर 'चावी' मारली तर त्याची लगेचच टकळी चालू होते. त्याच्या या खेळात घरातल्या सगळ्यांनाच विविध भूमिका निभवायला लागतात.
म्हणजे तो कायम 'राम'च असतो आणि बाकीचे त्याच्या इच्छेनुसार लक्ष्मण, सीता, सुग्रीव, वाली, हनुमान अगदी रावण, त्राटीका आणि शूर्पणखा सुध्दा.
तर परवा काय झालं ... एकत्र खेळताना यशनं जोरात कृष्णाच्या नाकाखाली बोट घासलं. सुरीनं कापावं तसं. आणि तो पडद्यामागं जाऊन लपला. कृष्णा नाक धरून आजीकडे गेली आणि तिचा पदर ओढून सांगू लागली, 'दादा..बाऊ...'
आपल्या नातवंडांच्या गुणांशी चांगलीच परिचीत असलेली आजी आधी यशला शोधू लागली.
पडद्यामागच्या यशला पुढे घेत म्हणाली, 'काय रे काय केलंस तिला?'
'काही नाही गं' .. यश.
'खरं सांग यश .. काय केलंस ..?' .. आजी.
'अगं आजी .. मी ना शूर्पणखेचं नाकच कापलं' .. यश.
यापुढं बोलण्यासारखं असं आजीकडं काहीच नव्हतं.

-------------------------------

रोज सकाळी आमचा आणि कृष्णाचा ठरलेला कार्यक्रम असतो.
'दातु' घासणे, मग गरम पाणी पिणे आणि मग ४-५ मनुका खाणे. तर आज हे सर्व पार पडल्यावर खाऊ खायची वेळ झाली. मला आपलं वाटलं की खाऊमध्ये शिरा आहे तर जरा देवाला नैवेद्य दाखवावा.
खाऊचा वास लागून कृष्णाबाई वाटी-चमचा घेउन तयारीतच उभ्या होत्या. तिची ओट्याशी उभं राहून, टाचा उंच करकरून हाताशी काही लागतंय का याची धडपड चालू होती.
कसंबसं रोखून मी तिला म्हणलं, 'आधी बाप्पाला देउयात का?'
झालं. ही माझ्यापुढे .. थेट देवापुढे हजर.
मी नैवेद्याची वाटी भरून तिथवर जाईपर्यंत हीनं आमचा मोठा बाळकृष्ण बाहेर काढला होता. त्याच्या मोठ्या आकारामुळे तो तिचा अधीक आवडता देव आहे. तर तिच्या दातांचा छोटासा ब्रश घेउन ती जोरात बाळकृष्णाला घासत होती. एकीकडे तोंडानं बडबड चालूच होती. 'दातु..बाप्पा..दातु'. मला कळेना की आता देवांचे ते हाल पाहून ओरडावं की खाऊ खायच्या आधी त्यांनी दात घासावेत हा आग्रह धरला म्हणून कौतुक करावं !
मी विचार केला ... असूंदे, देवांचे दात तरी कोण घासणार?

-------------------------------

मी आणि कृष्णा संध्याकाळ्च्या भाजी आणायला जवळच्याच मार्केटमध्ये गेलो होतो. खाली सोडलं तर ही भाज्या उपसते म्हणून मी तिला कडेवर घेतलं होतं.
माझ्या एका बाजूला एक वयस्कर बाई तर दुसरया बाजूला एक छानशी जीन्स आणि रंगीत टॉप घातलेली कॉलेज गर्ल खरेदी करत होत्या.
त्या मुलीनं कृष्णाला 'hi' म्हणलं आणि ती भाजी घ्यायला खाली वाकली. तिच्या modern वेषभूषेमुळे वाकल्यावर तिची पाठ दिसू लागली. झालं. कृष्णाचं लक्ष तिकडे गेलं आणि ती टाळ्या पिटत म्हणायला लागली, 'ढेरी पम पम...ढेरी पम पम'. काय झालयं ते पटकन माझ्या लक्षात आलं. मला वाटलं की आता मी इथून गायबच होईन तर बरं.
माझ्या शेजारच्या आजी गालातल्या गालात हसू लागल्या. भाजीवाली हसत-हसत मला म्हणाली ... लेकरूच हाये.आसूंदेत.
मी अत्यंत दिलगिरीनं त्या मुलीकडं पाहिलं तर ती चक्क हसत होती. टाळ्या वाजवणारया कृष्णाला पाहून ती म्हणाली ... she is so sweet.

तिला मराठीच कळत नव्हतं !


- सोनाली सुहास बेंद्रे 

Friday, January 27, 2006

रविवार ... मी .. आणि .. माझी लेक

रविवार. घरात आम्ही दोघीच .. मी आणि कृष्णा. कृष्णा म्हणजे माझी दीड वर्षांची लेक.
तर रविवारी पहटेच्या साखरझोपेत असताना मला जाणवतं की कोणीतरी गपकन माझ्या पोटावर बसलयं. अर्ध्या गुंगीत, घाबरून मी डोळे उघडते तर ही बया माझ्या पोटावर बसून घोडा-घोडा खेळत असते. घड्याळात पाहावं तर पहाटेचे ६-३० !
रविवारची सुरुवात ही अशी होते. आईला सुट्टी म्हणजे आपला पुरेपूर सहवास हा तिला लाभलाच पाहिजे असा जणू तिचा पणच असतो.

तिचा बाबा ऑफ़िसला गेल्यावर तर मला ही अगदीच एकाकी, विनारसद लढत वाटू लागते.
उजाडल्यापासून पायाला चक्रं बांधल्यासारखी तिची घरभर फिरती चालू असते. कांद्या-बटाट्याची टोपली उचकून घरभर कांदे पसरवणं, बाथरूममध्ये जाउन अंगावर पाणी ओतून घेणं, वर्तमानपत्रं, भिंती इ. वर स्केचपेन-पेन्सिल यांनी गहन गिरगोट्या ओढणं अशी तिची एक ना अनेक महत्त्वाची कामं चालू असतात.

आमच्या देवांना पूजेचा बहुमान हा फक्त शनिवार-रविवारीच मिळतो. आता पूजा करावी म्हणून मी देवघरापाशी जाते आणि बघते तर काय .. देव गायब! मला कळत नाही देव कुठे गेले? आणि मग अचानक लक्षात येतं की कृष्णाचा बराच वेळ झाला आवाज नाहीये. बाथरूममधून पाण्याचा आवाज येतो. जाउन बघते तर काय .. तांब्यानं देवांवर अभिषेक चालू असतो.
मला पाहून आधी ती जरा दचकते. आता ही आई आपल्यावर ओरडणार अशा खात्रीनं क्षणभर बघते आणि मग लगेच आपलं ते प्रोफेशनल गोड हसू चेहरयावर आणून मला म्हणते, 'बाप्पा .. मंबो'! म्हणजे बाप्पाची शंभो चालू आहे.
आता काय बोलणार? तो सर्व पसारा आवरून एकदाची बाप्पाची पूजा आटपते.

आता मोठ्ठा कार्यक्रम ... कृष्णाचं जेवण.
एका ताटात वरण-भात, दोन रिकाम्या वाट्या, २-३ चमचे, ३-४ चित्रांची पुस्तकं घेऊन कार्यक्रम सुरू होतो. त्याच्याबरोबरीनं खाल्लं नाहीतर भिती दाखावायला बुवा, गुरखा, डॉक्टर, टुचू वगैरे मदतीला असतातच.
५-६ घास खाऊन झाले की हातात भात घेउन तो जमिनीवर सारवणं, केस उपटून टकल्या केलेल्या आणि लोळवून मळलेल्या बाहुलीला जबरदस्ती भरवणं, आदी चालू होतं. एका बाजूनं माझी लेकी बोले, सूने लागे बडबड चालूच असते.
"वेडी बाहूली .. खात नाही .. वेडी आहे ना?"
"हूं ..." कृष्णा.
"थांब तिला बुवाकडेच देते. देउ का?"
"हूं ..." कृष्णा.
"टुचू देउ का तिला? बोलवू डॉक्टर काकांना?"
"हूं ..." कृष्णा.
सर्व प्रयत्न व्यर्थ जातात. पुढचा अर्धा तास कृष्णा, बाहुली आणि फरशी यांच्या सफाईत जातो.
तोवर ही इकडे बाहुलीला ओरडत असते.
"वेई ..हां ..!"
"टुचू .. हां ..!"
जे काही थोडंफार बोलता येतं तेच ती माझी नक्कल करत बाहुलीला सुनावत राहते.
बाहुलीनं आता ऐकलं अशी खात्री पटल्यावर मग पुढच्या उद्योगाचा शोध सुरू होतो.

एवढ्यात आमच्या शेजारची कृष्णाची मैत्रीण 'अस्मी' खेळायला येते. कृष्णा आपली मळकी, टकली बाहुली सोडून बाकी पुस्तकं, दोरयानं ओढायचा हत्ती, वगैरे तिच्यापुढे आणून टाकते. ही अस्मी २ वर्षांचीच आहे आणि तशी खूपच शांत आहे. या दोघींचा संवादही अगदी 'पाहण्याजोगा' असतो. दोघीही काही मोजकेच शब्द आणि बाकी त्यांच्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत असतात.
"अंबी .. घे ..घे.. " कृष्णा.
"कुतना .. ब (बस)" अस्मी.
"च ..फू.." कृष्णा. (बहुतेक चल फूल दाखवते असं असावं)
अस्मी काही उठत नाही .. कृष्णा तिला हात धरून उठवायला जाते. अस्मीला वाटतं की ही आपल्याला मारतीये. ती रडायला लागते. "मम्मी ....."
कृष्णा मला सांगयला येते. "आंबी ऊं..."
मग रडारडीची कारणं शोधून शांतता प्रस्थापीत करणं, दोघींना वाटीत खाऊ देउन एकाजागी बसवणं वगैरे पार पडतं. कृष्णा पट्कन आपल्या वाटीतला थोडा खाऊ खाऊन, बराचसा सांडून पसरवते आणि मग अस्मीच्या वाटीत हात घालून तिचा खाऊ खायला लागते. आत मात्र अस्मी खूपच वैतागलेली .. रडवेली. कृष्णाच्या मते तिनं फारसं काही केलेलंच नसतं. त्यामुळे ती निवांतपणे आपल्या मैत्रीणीकडे पाहात बसते. मी जरा तिला 'सॉरी' म्हण. बघ तुझी मैत्रीण रडतीये ना. वगैरे संस्कार करायचा व्यर्थ प्रयत्न करते.

एव्हाना तिच्यामागे धावून माझा जीव पार कंटाळलेला असतो. घराची अवस्था तर अगदी पाहण्याजोगी असते. घरभर पुस्तकं, खेळणी, कांदे-बटाटे, स्केच पेन्स, खायला दिलेले मुरमुरे, पाणी वगैरे इतस्तत: पसरलेलं असतं. एखाद दोन देव परत टेरेस मध्ये गेलेले असतात. टेरेस मधल्या झाडांची पानं, फुलं घरात आलेली असतात. एका बाजूला T.V. तर दुसरया बाजूला टेपवर ढणाढणा बडबड-गीतं वाजत असतात. मी अगदी थकून या पसारयाकडे पाहात राहते. आपोआपच डोळे मिटतात. जाग येते तर माझी चिमणी लेक आपल्या चिमण्या हातांनी माझ्या डोक्यावर जोरजोरात थोपटत म्हणत असते...गाउ..गाउ...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Monday, January 23, 2006

नवनिर्माण

अचानक वेदना सुरु होतात आणि कुठेतरी मनात जाणवतं की हेच ते. कदाचित तो क्षण आता कुठेतरी वळणावरच आहे.
दवाखाना .. ते वातावरण .. पण एक कोणतीतरी भिंत मध्ये उभी असल्यासारखं ते माझ्या मनापर्यंत पोहोचतच नाही. छातीतली धडधड मधेच वाढते .. कमी होते. आतलं ते हलणारं 'जीवन' प्रत्येक वेणेबरोबर स्वत:चं अस्तित्त्व सिध्द करतंय.
जसं काही आतून आवाज उमटतोय .. येऊ का?

सारा दिवस आणि उभी रात्र .. अशीच सरते वाट पाहण्यात.
सगळं जग झोपलेलं, शांत आणि नि:स्तब्ध. माझ्याबरोबर आलेली माझी माणसंही शांत झोपेच्या अधीन. मी मात्र टक्क जागी. रात्र वाढेल तसा वेदनेचा उत्सव अजूनच वाढतोय. मी आणि माझ्यातलं ते जीवन .. आमच्या दोघात वेदनेची एक लय बांधली जातीये. रात्रीच्या त्या नीरव शांततेत आपण दोघंही वाट बघतोय .. एकमेकांना सांगतोय की थांब, आता थोडक्यावरच आहे.

त्या लयीतच उजाडतं. सकाळ होते. माझी माणसं विचारतात, 'बरी आहेस ना? झोप लागली का?' त्यांना काय सांगणार? मी आणि तू .. आपला रात्रीतला तो संवाद .. आपण एकत्र भोगतोय त्या वेदना. त्यांना सांगून त्या कळाव्यात तरी कशा?
मी हसून म्हणते, 'बरीये.' तू पण आतून तेच म्हणलंस का?

दिवस चढेल तसा वेदनेचा एक अंगार उसळायला लागतो. एक वाढती आगच जशी काही. असं वाटतं की शरीर जसं काही पेटलयं. एक गरम वाफ अंग भाजून काढतीये. ही वाढती लय आता सोसत नाहीये. तुला होणारा त्रासही मला जाणवतोय. मला जाणवणारी .. पिळून काढणारी प्रत्येक वेणा तुलाही जशी पुढे ढकलतीये. तुझ्या प्रवासाचा शेवटचा टप्पा आता जवळ येतोय.

आता मात्र मला थोड रागही येतोय. हा सर्व त्रास मला तुझ्यामुळे होतोय हे तुला माहितीये का? भिंतींवर हात आपटून मी तो व्यक्तही करतीये. मला खूप मोठ्यांदा ओरडावंसं वाटतंय. पण माझा सुस्कृंतपणा आड येतोय.

माझी माणसं आता काळजीत. कसं होणार हिचं? सगळं नीट होईल ना? पण मी मात्र आता त्या लयीशी समरस झालीये .. आणि तू पण.
माझा कण न कण .. माझा श्वास आणि मन सारंच एका झोक्यावर आहे. एकदा तो झोका असा उंच जातो की श्वास पुरत नाही. मन, संवेदना बधीरतात.
त्या हिंदोळ्यावर झुलताना मी सारं विसरलीये.
आजूबाजूचं जग .. त्यातली माणसं .. मी .. माझं शरीर .. सारं काही.
जाणवतंय ते फक्त तुझं अस्तित्त्व .. तुझा आकार .. तुझा वाढता जोर.
वरवर जाणारा उंच झोका ... एवढा उंच .. उंच.
माझे पाय जमिनीवरून कधीचेच सुटलेत.
माझं भान हरपलंय.
जगाशी संपर्क तुटलाय.
तुझ्या - माझ्यातली वेदनेची ती लय आता सम गाठतीये.

.......

थकलेलं शरीर .. पण उत्सुक मन .. तुला पाहायला, जाणून घ्यायला.
तू माझ्या हातात आणि मला ओळख पटते.
तू डोळे किलकिले करून माझ्याकडे पाहातेस .. निरखून घेतेस.
तुलाही ओळख पटलीये बहुतेक. कारण तू परत डोळे मिटून निवांत होतेस. विश्वासून माझ्या कुशीत गुरफटून घेतेस.
सरल्या प्रवासाच्या वेदना .. त्या वेदनांच्या खुणा. ना तुझ्यावर .. ना माझ्यावर.
आपण दोघी एकमेकींतच गर्क. परस्परातले ओळखीचे धागे बांधण्यात हरवलेल्या.

माझी लोकं मात्र म्हणतात, सुटली बिचारी एकदाची, थकली असेल. शेवटी जीवातनं जीव बाहेर यायचा म्हणजे...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Friday, January 13, 2006

मिनॉपॉलिसच्या विमान फलाटावर

आत्ता मी मिनॉपॉलिसच्या विमानतळावर गेट नं. १० वर बसलेली आहे.
गेट म्हणजे थोडक्यात काय तर फलाट. माझं मिनॉपॉलिसहून बाल्टिमोरला जायचं विमान इथे लागणार.
एस टी स्टँडवर बसणं आणि विमानतळावर बसणं यात मूळ स्तरावर काहीही फरक नाही. वातावरण बदलतं इतकंच. बाकी दोन्हीकडे लोकांचे हेतू सारखेच. एकीकडून दुसरीकडे जाणे. आणि मधला वेळ हा असा फलाटावर बसून घालवणं..म्हणजे वाचन, निरीक्षण, खाणं-पिणं, वगैरे.

पलीकडेच्या फलाटावर असणारी गर्दी आपल्या विमानाची वाट पाहात होती. काहीजण वाचत, काही कॉफ़ी पीत, तर काही..काही न करताच गेट उघडण्याची वाट पाहात होते. त्यातलं एक छोटंसं बाळ मजेत इकडे-तिकडे रांगत होतं. त्याची आई सारखी त्याला उचलून आणत होती...प्रेमानं दटावत होती. पण बाळ भारी खट्याळ...आईचा डोळा चुकवून ते आपलं वेगळ्याच दिशेनं परत रांगत सुटायचं.
त्यांच्या समोरच्याच रांगेत एक वयस्कर बाई बसल्या होत्या. बहुधा एकट्याच प्रवास करत असाव्यात. आजी मोठ्या रसिक दिसत होत्या. छान कलर केलेले केस..मेक-अप..गळ्यात मोत्यांची माळ..मोठ्या फुलांचं कानातलं..आणि हो..त्यांच्या त्या झग्याला शोभेल अशाच मोठी फुलं असणारया त्यांच्या चपला.
आता बाळानं मोहोरा इकडे वळवला, तो थेट आजीबाईंच्या चपलांकडे.
चपलांवरची ती मोठी रंगीत फुलं तोडावीत असं काहीतरी त्याच्या मनात असावं. छोटंसं पुस्तक वाचण्यात रमलेल्या आजी एकदम दचकल्या. घाबरून पायाकडं पाहतात तर काय..हे चिमणं मजेत त्यांच्या चपलांवरचं फूल धरून खेचत होतं. आजी झट्कन खाली वाकल्या. त्यांनी बोळकं पसरून हसणारया त्या बाळाला उचलून घेतलं. तेवढ्यात बाळाची आई आली. कौतुकानं आपल्या बाळाला दटावत आजींना sorry वगैरे म्हणाली. अगं ठीक आहे..चालायचंच..लहान आहे..इंग्रजीत आजी म्हणाल्या असाव्यात. एव्हाना बाळ आजीच्या मांडीत बसून त्यांच्या पर्सशी..मोठ्या फुलांच्या कानातल्याशी खेळत होतं. त्याला त्या रंगीत आजी भलत्याच आवडलेल्या दिसत होत्या. आजी मग काहीसं गाणं म्हणू लागल्या..आपल्या चिऊ-काऊ सारखं. माझा आपला एक अंदाज. बाळाची आई अगदी प्रेमानं बाळाकडं पाहात होती.
फार मोहक द्रुश्य होतं ते. मला वाटतं..वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.

त्यांच्या विमानाचं गेट उघडलं. बाळाच्या आईनं बाळाचा पसारा आवरला. त्या दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला.
आजींनी आपल्या कानातली ती मोठाली फुलं काढून बाळाला दिली. बाळ खूश.

इकडे आमच्या फलाटाकडे मगाचपासून एक बाई आपल्या मुलीला सारखं खेकसत होत्या. ती ५-६ वर्षांची मुलगी सारखी खुरडत खुरडत इकडे-तिकडे जायला बघत होती. आणि तिची आई ओरडत, खेकसत, तिला ओढून, खरंतर फरपटत परत जागेवर आणत होती. त्या मुलीला ते आवडत नसावं. मोठ्या आवाजात ती आपला निषेध नोंदवत होती. विचित्र हातवारे करून आईला कहीसं सांगू पाहात होती. बराच वेळ हे चालू होतं. ती आई बिचारी लोकाच्या नजरा टाळत, मुलीला जागेवर बसवायला बघत होती.
मधेच समोरच्या रांगेतल्या खुर्च्यांकडे ती मुलगी गेली. तिथे एक तरुण मुलगा..पाठीला sack, पायाशी गिटार केस.. पुस्तकात तोंड खुपसून बसला होता. अजून एक बाई laptopवर काहीसं काम करत होत्या.
ही मुलगी आईचा डोळा चुकवून त्यांच्यापाशी गेली. laptopवर काम करणारया बाईंपाशी उभं राहून laptop कडे बोट दाखवून, तिच्या भसाड्या आवाजात त्यांना काहीसं सांगू लागली. तिला laptop पाहून खूप आनंद झाला असावा. तिच्या तोंडातून गळणारी लाळ बाईंच्या पायावर पडत होती. बाईंचं लक्ष वेधून घ्यायला ती त्यांचा स्कर्ट ओढू पाहात होती. कामात गर्क बाई दचकल्या..त्यांचं तिच्याकडे लक्ष गेलं..आणि त्यांचा चेहरा एकदम बदलला. अतिशय किळसवाणी गोष्ट पाहिल्यासारखा चेहरा करून त्यांनी तिचा आपल्या गुडघ्यावरचा हात झटकला. ती बेसावध मुलगी जराशी हेलपाटली..घाबरली. तेवढ्यात तिची आई धावत आलीच. पडेल चेहरयानॆ, परत-परत माफी मागत राहिली. फरपटतच तिनं आपल्या मुलीला परत खुर्चीशी आणलं.
मुलगी तिच्या भसाड्या आवाजात किंचाळत होती..हात-पाय झाडत होती. आईच्या हातातून निसटून जायला पाहात होती. आई तिला सावरायचा प्रयत्न करत होती. तिचे कपडे नीट करत, तिच्या तोंडातून गळणारी लाळ पुसत होती. त्यांच्याकडेच पाहणारया आजूबाजूच्या माणसांची नजर चुकवायला बघत होती.

आधी राग..मग तिरस्कार..अगतिकता..आणि मग केवळ प्रेम. आईच्या चेहरयावरचे भाव झरझर बदलत होते.
एव्हाना स्वत: शांत होऊन, आईनं तिलाही शांत केलं होतं. एक मोठीशी बाहुली तिच्या हातात देऊन ती करुणेनं..प्रेमानं आपल्या मुलीकडं पाहात होती. ती मुलगी आपल्या त्याच भसाड्या आवाजात आईला काहीसं सांगत होती. त्या मायलेकी आता स्वत:च्याच विश्वात रमल्या होत्या.

ही एक आई..आणि मघाचीही आईच. हे आईचं प्रेम..आणि तेही तिचं प्रेमचं.
मला वाटतं..खरचं वात्सल्याची भावना ही इथून-तिथून सारखीच असावी.


- सोनाली सुहास बेंद्रे 

Saturday, January 07, 2006

चांभार

कामं आवरून परत निघताना असंच समोरच्या झाडाखाली लक्ष गेलं.
अंथरलेलं एक पोतं...एका छोटया पत्र्याच्या डब्यात बारक्या चूका...प्लास्टिकच्या फ़ुटक्या भांडयात पाणी...कुठे चामडयाचे २-४ तुकडे आणि चप्पल ठेवायचा तो चिरपरिचित लोखंडी फणा.
आणि एकदम लक्षात आलं की एवढयात आपण चांभार या व्यक्तीकडे गेलोच नाही.

किती महिने...वर्षं झाली काय माहीत?
पण चांभार या माणसाशी जसा संबंधंच उरलेला नाही.
परत त्या पोत्यावरच्या पसाऱ्याकडे आणि चप्पल तुटलेल्या गिऱ्हाइकांची वाट पाहणाऱ्या त्या चांभाराकडे पाहून कससंच वाटलं.

शेवटचं मी चांभाराकडे कधी बरं गेले होते...? काही नीट आठवत नाही.
आमच्या कॉलेजच्या रस्त्यावर एक म्हातारे चांभार आजोबा बसायचे. तेव्हा त्यांच्याकडे कधी-मधी मी जायची.
कुठे अंगठा तुटला...शिवण निघाली...१-२ रुपयात काम व्हायचं.
मला आठवतं..ते आजोबा अगदी मान-पाठ एक करून टाका घालायचे.
जाड काचेचा, धुळवटलेला..खिळखिळा झालेला त्यांचा तो चष्मा सारखा नाकावरून खाली घसरायचा..
आजोबा काहीसं पुटपुटत तो वर घ्यायचे...आणि मग थोडं जास्तच वाकायचे.
त्यांच्यामागच्या दोरीवर दोन-चार चपलांचे जोड टांगलेले असायचे.
कोणी कधी त्या चपला विकत तरी घेतल्या का कोण जाणे...

काम असू..नसू..त्यांची नजर आपली सतत खाली..लोकांच्या पायांकडं आणि चपलांकडं.

बरंच पुढं कधीतरी ते दिसेनासे झाले. ते ज्या भिंतीशी बसायचे त्या बँकेत मग मी विचारलं.
ते एक म्हातारे आजोबा..चांभार..इथे बसायचे..कुठे हो गेले?
तिथला शिपाई म्हणाला..ते म्हातारं होय? घालवलं त्याला.
बँकेची दुरुस्ती झाली..फ़ुडं थोडं वाढवलं..कुंड्या..नवा रंग अन काय काय.
मग त्यात घालवलं त्याला.

मला चांभार आजोबांच्या पागोट्याचा मळलेला, कधीतरी भडक गुलाबी असलेला रंग आत्ताही डोळ्यापुढे आला.

आता चप्पल तुटली की लगेच नवी घ्यायची. नाही...असे कितीतरी जोड..चपला..बूट..फ़्लोटर्स..कपाटात पडलेले असतात.
मग आधीची तुटलेली चप्पल दुरुस्त करायचा प्रश्नच येत नाही.
ती अडगळीत आणि मग पुढे कधीतरी भंगारातही जाते.
घरातले मागच्या पिढीतले मग म्हणतात...
तुम्हाला ना पैशाची किंमत नाही..काय बंदच तर तुटलाय ना.
कोपऱ्यावरून लावून आण..२-३ रुपयात काम होईल.


- सोनाली सुहास बेंद्रे 

Wednesday, January 04, 2006

लिहायचं म्हणून...

परत लिहायचं म्हणून... अशी वर्षे सरून गेली...
कागद पडले पिवळे...अन् लेखणी सुकून गेली...

आता लिहायचंच म्हणून किती संकल्पही केले
पण वेळ तरी कुठे असतो म्हणत सोडूनही दिले

वाचन..चिंतन..विचारमंथन..काय बरं करावं..
आता लिहायचं म्हणलं तर हे जमवायलाच हवं..

म्हणता म्हणता..करता करता..कुणीसं सुचवलं..
आणि "लिहायचं म्हणून..." ब्लॊग उघडून एकदाचं जमवलं...


- सोनाली सुहास बेंद्रे