Thursday, June 24, 2021

बाबा

हान असताना बाबांची उंची हा माझ्यासाठी सर्वाधिक अभिमानाचा विषय होता. आठवणी शोधत लहान होताना समोर उभे असलेले उंच बाबा आणि मान मोडेतो वर पाहणारी छोटी मी हे चित्र स्पष्ट आठवतं. त्यांच्याबरोबर बाहेर जाताना आपले बाबा हे सगळ्या बाबांच्यात उंच आहेत याचा खूप आनंद व्हायचा आणि अतिशय सुरक्षित वाटायचं. माझी उंची वाढताना आदर्श नवर्याच्या अपेक्षायादीत बाबांसारखी उंची असलेला हे प्रथम क्रमांकावर असायचं. असो. 

लहानपणी गुरुवार आणि चितळे बंधूंची बाकरवडी व जिलेबी हे आमच्यासाठी अतूट समीकरण होतं. तेव्हा चितळे बंधूंकडून या गोष्टी खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर मोठी रांग असायची. बाबा त्यांच्या गुरुवारच्या सुट्टी दिवशी कितीही उशीर झाला तरी बाकरवडी आणि जिलेबी आणायचेच. गुरुवार हा जणू मेजवानीचा दिवस असायचा :) 

सगळ्या चुलत भावंडात एकत्रित राहताना, खेळताना जखम झाल्यावर, खास करून योगीला, दम देऊन घट्ट धरून औषध लावणारे बाबा, नंतर खाऊ समान वाटणारे, फळं कापून खायला घालणं याचा जणू एक कार्यक्रम करणारे, दिवाळीत सगळ्यांना गोल बसवून आहे त्या फटाक्यात रोजचं रेशन देणारे बाबा आम्ही ते वाजवतोय ना इकडे पण लक्ष द्यायचे. लहानपणी मी हातात उदबत्ती घेऊन लक्ष्मी बॉंम्ब कडे बराच वेळ बघत बसायचे, भीती वाटायची पण फटाके वाजवायचेच हे बाबांनी सांगितलेलं असायचं. बाबा हात धरून, समजून सांगत फटाके लावायला मदत करायचे. मग हळूहळू फटाक्यांच्या रोषणाईच्या गंमतीत भीती पळून जायची. थोडी भीती घालवली, धीर धरून  गोष्टी केल्या की त्याचं मिळणारं फळ हे पण मोठं गोड असतं. बाबांकडून मिळालेला हा धडा २ वर्षांपूर्वी भूतानला टायगर नेस्ट हा एक मोठा ट्रेक करताना नकळत कृष्णाला दिला गेला. 

बाबांनी मला आणि योगीला आमच्या आवडीप्रमाणे त्यांच्या परिघातल्या उत्तम गोष्टी उपलब्ध करून दिल्या. मग ते योगीसाठी क्रिकेट प्रशिक्षण आणि त्यातील गोष्टी असोत किंवा माझ्यासाठी चित्रकलेचं सामान असो. मी मोडक्या कविता लिहिती झाल्यावर मोठ्या कौतुकाने मुलांच्या मासिकांचा अभ्यास करणं, संपादकांशी पत्रव्यवहार करणं आणि चिकाटीने त्या कविता छापून आणणं, आकाशवाणीमध्ये प्रयत्नपूर्वक बालचित्रवाणीमध्ये सहभाग मिळवणं हे सगळं त्यांनी खूप उत्साहात केलं. वेगवेगळ्या गोष्टी हाताळणं आणि त्यातून आपल्याला काय आवडेल हा अंदाज घेणं हा आत्मविश्वास त्यातून आला. 

मी जाहिरात क्षेत्रात पदवी घेणं ही तेव्हा वेगळी गोष्ट होती, सर्वमान्य नव्हती. पण शिक्षणाच्या त्या ५ वर्षात आई-बाबांनी दाखवलेला प्रचंड विश्वास, नंतर बंगलोर ला नोकरीसाठी जाण्याची माझी इच्छा असताना त्यांचं पाठीशी उभं राहणं या २५ वर्षांपूर्वी खूप मोठ्या गोष्टी होत्या, त्यांच्या त्या विश्वासाने माझा आत्मविश्वास दुणावला. तो सगळा काळ खूप खूप समृद्ध झाला. उत्तम गुरू लाभले, जीवाला जीव देणारं मित्रमंडळ मिळालं आणि त्या सगळ्यांना आई-बाबांनी घरचं मानलं. 

आम्हा दोन्ही मुलांबाबतचे महत्वाचे निर्णय घेताना बाबांनी आम्हाला कमालीचं निर्णय स्वातंत्र्य दिलं. प्रत्येकवेळी त्यांच्या स्वभावानुसार संदर्भ तपासायला सांगितले, फायदे-तोटे समजून सांगितले. एकांगी निर्णय न घेता ते आमच्यावर सोडले. बाबांच्या या सवयीचा, ऍनालीटीकल स्किल्स चा मला खूप फायदा झाला. हे कौशल्य मला माझ्या नोकरीत आणि व्यवसायात खूप उपयोगी आलं , येतंय. 

प्रत्येक प्रसंगात पाठीशी राहणारे आई आणि बाबा.
जगात मिसळण्यासाठी वेळेवर हात सोडून देणारे, पण आपली मुलं केव्हाही आधाराला परत येऊ शकतील या जाणिवेनं सतत न थकता उभे राहणारे, माझ्या लग्नाला केवळ ८ दिवस राहिलेले असताना तू ठीक आहेस ना, काही प्रश्न नाहीत नं असे विचारणारे बाबा, माझ्या अवघडशा बाळंतपणात सगळं ठीक होईल हा विश्वास देणारे आणि माझी काळजी डोक्यावर घेणारे, माझ्या लहानशा पिल्लाची सुरुवातीची २ वर्षे जसं काही पालकच झालेले, कृष्णाच्या मोठं होण्याच्या वयात आम्ही दोघे कामानिमित्त बाहेर असताना तिच्याशी फोन करून बोलत राहणारे, माझं मन मोकळं करण्याचे हक्काची जागा असलेले बाबा... 

...  आता माझा आणि कृष्णाचा आवाज ऐकायला म्हणून रोज आवर्जून फोन करतात. स्मार्ट फोन वापरताना कुठेतरी अडतात आणि मग २-२ दा विचारून खात्री करून घेतात. मोठ्या अभिमानाने इंजिनीअर होऊ घातलेल्या नातवाचं, त्याच्या गीता अभ्यासाचं न थकता माझ्यापाशी कौतुक करतात, गुगल पे वापरता का म्हणलं तर नको नको म्हणतात, सावकाश चालतात, कधी माझ्याकडे आलेच तर झोपताना लाईटची बटणं आणि गॅस २ दा तरी चेक करतात, काही दुखणं आलं तर काळजी करतात की इतरांना त्रास नको, कधी झालीच माझी चिडचिड तर शांत बसतात, आणि थोड्याच वेळात नवीन जगाबद्दलचे प्रश्न मला परत परत फोन करून विचारतात... तेव्हा मला वाटतं की आता आमचे रोल बदलले आहेत, आणि मी त्यांची हळूहळू पालकच होतीये . 

- सोनाली सुहास बेंद्रे 

Monday, April 02, 2018

गच्चीवरच्या बागेच्या गोष्टी - २


आमच्या गच्चीवरच्या बागेत कंपोस्टच्या 3- 4 मोठ्या कुंड्या आहेत. रोज त्यामध्ये ओला कचरा टाकणे, कोकोपीट आणि मग वाळलेल्या पानांचा थर पसरणे हा एक नित्यनेम आहे.

हे करत असताना अनेक पक्षी, खासकरून राखाडी मानेचे ४-५ कावळे आजूबाजूला जमलेले असतात. जिन्याचे लोखंडी कठडे, केबल आणि अजून कसल्या जाड वायर्स यांवर बसून त्यांचे या सगळ्याचे बारीक निरीक्षण चालू असते. थोडे पलीकडे, गच्चीच्या एका बाजूला पक्षांसाठी खाऊ ठेवलेला असतो. पण तिथे जमलेल्या इतर पक्षांना दमात घेऊन हुसकून लावणे आणि आजचा मेनू काय आहे ते पाहून उष्टावणे एवढे झाले की ते परत माझ्यावर नजर ठेवायला येऊन बसतात. माझी पाठ वळली की एक एक करून हे कावळे खाली उतरतात. कुठे चुकून ओल्या कचऱ्यात राहिलेला खाऊ, किडे टिपून घेतात. त्यांच्यापैकी कोणी जर हजर नसेल तर हाका मारून त्याला बोलवून घेतात.

यादरम्यान एखाद दुसरे कबुतर, साळुंक्या कधीतरी बुलबुल यांची दुसऱ्या बाजूला खाऊवर यथेच्छ मेजवानी चालू असते. आवडीचा खाऊ नसेल तर जशी विरक्ती आल्यासारखे हे कावळे या सर्वांकडे बघत बसतात. आणि खरं तर कबुतरांच्या दादागिरीला थोडे वचकूनही असतात.

आता तर आम्ही एकमेकांना थोडेफार सरावलो आहोत. कधी मला गच्चीवर जायला उशीर झाला तर आमच्या खालच्या मजल्याच्या खिडकीशी उतरलेल्या गुलमोहोराच्या फांदीवर पक्षांची वर्दळ वाढते. "आले, आज जरा उशीर झाला"  असे ओरडून सांगावे तर त्यांना ते कळले असे काहीसे वाटते. कारण गच्चीवर जाईपर्यंत आपापली जागा घेऊन ही मंडळी वाटच बघत असतात. आधी तर डोक्यावरून भुर्र्कन उडून जाणाऱ्या कावळ्यांची मला भीतीच वाटायची. पण आता थोडे अंतर राखून, त्यांचा एकमेव डोळा माझ्यावर ठेवून ते बसून राहतात आणि मीही निवांतपणे माझी कामे चालू ठेवते.

झाडांना पाणी घालताना, छोटेसे टोमॅटो, काकडीची पिवळीधम्मक फुले, मी-तू करत वाढणारे लाल माठाचे तुरे यांच्याशी गाणी- गोष्टी करताना कावळे हे माझे श्रोते आणि दर्शक असतात. मान तिरकी आणि एकूणच सर्व काही समजत असल्याचा अविर्भाव, मध्येच एखादी काव-काव अशी बसल्या जागेवरूनच साथ देत असतात. सोयीने जागांची अदलाबदल, कुठे क्वचितच  मातीतल्या काढून टाकलेल्या हुमणी आळीचा फडशा पाडणे हे त्यांचे होईपर्यंत माझे काम आटोपते आणि ही 15-20 मिनीटाचीच मैफल संपवून कावळे उडुनही जातात.

कधी काही कारणाने हा नेम मोडला की चुकल्यासारखे वाटते. घरचे सांगतात की आज तुझे पक्षीमंडळ वाट बघून खाली येऊन गेले. आमच्या कामवाल्या मावशी तर म्हणतात - अहो पूर्वज आहेत ते, म्हणून तर रोज बसतात वाट बघत.  रोजच्याला घास देताय, पुण्यच लागेल.

पापपुण्याचे माहीत नाही, पण रोजची झाडांच्या आणि पक्षीमित्रांच्या सहवासातील ती 15 मिनिटे दिवसभराची ऊर्जा देतात हे मात्र खरे!

© सोनाली सुहास बेंद्रे

Sunday, March 25, 2018

गच्चीवरच्या बागेच्या गोष्टी - १




यंदा फेब्रुवारीचे शेवटचे दिवस जरा तापूनच आले. मला आमच्या गच्चीवरच्या बागेची काळजी वाटू लागली. रोज पाणी घालताना माती फार कोरडी पडत नाही ना, कुंड्यांमधले पाणी टिकावे म्हणून पसरलेली वाळलेली पाने वाऱ्यावर उडून तर जात नाहीत ना किंवा कुठल्या हिरव्यागार पानाला उन्हाने नख तर नाही ना लावले याकडे बारकाईने लक्ष जाऊ लागले.
तशातच एका मोठ्या कुंडीत मजेत वाढलेल्या मदनबाणाच्या झाडाची पाने झडायला सुरुवात झाली. छान हिरवी असलेली पाने कुठे थोडीशीच सुकल्यागत होऊन जीव टाकू लागली. 2-3 दिवसातच सगळी पाने गळून झाड अगदी केविलवाणे दिसू लागले. उरल्या त्या वाळक्या उदास काड्या. त्याला तसं बघून जीव अगदी छोटासा होऊन गेला.  2 दिवस असेच गेले. खाली पडलेली मदनबाणाची ती ओळखीची पाने उचलून टाकताना भारी वाईट वाटू लागले. गच्चीवरील एवढी बाकी हिरवाई पण त्यात जीव रमेना.

एखादा दिवस गेला असेल आणि मदनबाणाच्या वाळक्या काड्यांवर छोटीशी हिरवी पाने फुटायला लागली. पुढच्या 2-3 दिवसातच त्याच्या हिरव्यागार पानांच्या गर्दीतून असंख्य पांढऱ्याशुभ्र कळ्या डोकावू लागल्या. चार पाच दिवसातल्या या सगळ्या कौतुकाचे नवल करेपर्यंत मदनबाणाच्या फुलांनी जसा उत्सवच मांडला. झाडावर उमललेल्या फुलांच्या त्या चांदण्या इतक्या सुरेख दिसत होत्या की 4 दिवसापूर्वीचे मरगळलेले झाड ते हेच का असे वाटू लागले.

पुढचे काही दिवस त्या मदनबाणाच्या चांदण्या निरखण्यात आणि त्याच्या वेड्या सुवासात मनसोक्त डुंबण्यात गेले. काही फुले देवाने ल्यायली, काही घरामध्ये जागोजागी सजून सुगंध देत राहिली, काहींचे गजरे झाले आणि अगदी आमच्या फळवाल्या आजीबाईंनीही माळून लाजून साजरे केले.

थोडीशी काय ती मदनबाणाची शुभ्र फुले पण केवढी त्याची ती मोहक किमया, नाही का?


© सोनाली सुहास बेंद्रे

Tuesday, March 22, 2016

देवदर्शन

आम्ही कोल्हापूरला पोहोचलो तेव्हा सारे कोल्हापूर जवळजवळ झोपले होते. रात्रीचे १२ वाजायला आले होते. एरवी भरल्या दुकानांनी, माणसांनी गजबजलेले छोटेसे वाटणारे रस्ते आता अगदी प्रशस्त वाटत होते. खरंतर परिचयाचे पण आत्ता ओळखीच्या खुणा शोधण्याचे आमंत्रण देणारे असे काहीसे वाटत होते. २ -३ जागा पाहून झाल्यावर आमच्या १२-१५ जणांच्या ग्रुपला देवळाच्या अगदी मागेच राहायला जागा मिळाली. प्रवासाने आखडलेली सर्वजण पाय पसरून निवांत झाली. मुलांचा दंगा सुरू झाला तर आज्यांनी पाय पसरून गप्पा जमवल्या. जसे काही रात्रीचे १२ नाही तर सकाळच होऊ घातली आहे. गंमत म्हणजे त्या लॉजचा मालकही अगदी निवांत वाटत होता. त्याला दिवसभरात आत्ता कुठे उसंत मिळाली असावी असं दिसत होतं. आम्ही त्याला विचारले "सकाळी किती वाजता जावे म्हणजे काकडारती मिळेल?" "४ वाजता जा. सुरेख दर्शन होईल." तो म्हणाला. "पण बायकांना अगदी आत परवानगी नाही बरंका!"

आम्ही त्या सकाळी जोतिबाच्या डोंगरावर जाऊन आलो होतो. मला तेथील आठवण झाली.

जोतिबाचा भला लांब पसरलेला दर्शनमार्ग पार करून आम्ही गाभाऱ्याच्या जवळपास आलो होतो. गुलाबी रंगात रंगलेली गर्दी जोतिबाच्या नावाने चांगभलं करत होती. आयाबाया एकमेकींशी गप्पा मारत एका बाजूस निवांत चालणाऱ्या पोरांना ओरडून पुढे ढकलत होत्या. गुलबक्षी रंगात सारा परिसर रंगून गेला होता. देवळाच्या काळ्या दगडांवर, उंच गेलेल्या काळ्या कळसावर, झाडांच्या पानांवर, हातातल्या फुलांवर सगळीकडे जसा एक गुलाबी उत्सव मांडला होता.
देवळाच्या मुख्य गाभाऱ्यात आल्यावर आम्हा बायकांना मागेच थांबवण्यात आले. आमचे नवरे, दीर, मुलगे पुजारयाबरोबर देवाच्या पुढ्यात गेले. मी, माझ्या जावा, सासवा, मुली आमच्या घरातल्या पुरुषांचे कपडे, पाकिटे वगैरे संभाळत मागच्या चौकात उभ्या राहिलो. मघाच्या रांगेतल्या नऊवारीतल्या बायका माझ्या बाजूला उभ्या होत्या. मधल्या गर्दीमुळे हरवलेल्या, न दिसणाऱ्या मूर्तीला त्या मनोभावे नमस्कार करत होत्या. चुकारपणे मागे राहिलेल्या मुलाला पुढे ढकलत होत्या आणि त्यांच्या छोट्या बहिणींना हाताने मागे ओढत होत्या.
"तुमचे फुडे गेले वाटतं" माझ्या बाजूची बाई मला विचारत होती. ती आणि मी दोघीही आमच्या आमच्या धन्यांचे कपडे संभाळत आणि पोरा बाळांना सावरत गर्दीतून पुढचे काही दिसतंय का ते पाहात होतो. मला खरंतर जोतिबाची ती मूर्ती जवळून पाहायची होती. घोड्यावर स्वार झालेल्या त्या रेखीव, रुबाबदार मूर्तीला पुढ्यातून न्याहाळायचे होते. लाल मखमली अंगरखा आणि डोक्याला जरतारी पागोटे घातलेला काळ्या दगडातला तो रांगडा देव जसा लग्नास निघालेला नवरदेवच वाटत होता. माझी छोटी बाबाबरोबर पुढे जायला न मिळाल्यामुळे हिरमुसली होती. तिला उचलून दाखवत मी म्हणले होते, "अगं बघ की बाप्पा पण आपल्याकडेच बघतोय घोड्यावर बसून." आम्हा दोघींना या कल्पनेने खुद्कन हसू आले होते.

आणि आत्ता कोल्हापुरातला हा लॉजचा ME Structural Engineer असलेला मालक आम्हाला सांगत होता, "अहो सगळे कसे ठीक चालू होते. पण दोनेक वर्षापूर्वी या बायांना काय सुचले काय माहीत. सगळी बंधने तोडून गाभाऱ्यात घुसल्या. स्त्रीमुक्तीच्या नावाखाली गोंधळ नुसता! आपल्या संस्कृतीच्या विरोधात जावेच कशाला? ज्याने त्याने आपापले नेमून दिलेले काम करावे. हे असले वागणे म्हणजे देवीच्या कोपाला निमंत्रणच, नाही का?" त्याने आम्हालाच विचारले. रात्री १२ वाजता त्यांच्याच लॉज मध्ये बसून मान डोलावण्याखेरीज आम्ही दुसरे काय करू शकणार होतो?

दुसरा दिवस पहाटे ३-३० लाच सुरू झाला. खूपच कमी भाविक असल्यामुळे आम्हाला बसायला छान जागा मिळाली. देवीच्या मूर्तीचा अभिषेक चालू होता. पहाटेच्या त्या शांत वातावरणात पुजार्यांच्या मंत्राचाच काय तो एक आवाज होता. दूधापाण्याच्या अभिषेकात न्हाऊन निघणारी ती मूर्ती आधी तर अनोळखीच वाटत होती. आतापर्यंत शालू-शेल्यांत सजलेली, दागिन्यांनी मढलेली देवीच पाहिली होती. याआधी स्त्रीसुलभ भावनेने नेहमी देवीचा शालू आणि पारंपरिक दागिने याकडे निरखून पाहिले होते. देवीला नमस्कार करताना लहानपणापासून मोठ्यांनी देव दिसला की नमस्कार करण्याची दिलेली शिकवण, देवीची भक्ती आणि कोप यावर वाचलेले साहित्य आदीचा प्रभाव असायचा. त्यामुळे नमस्कारास एक धाकाची किंवा एक कर्तव्य केल्याची किनार असायची. पण आजचे देवीचे हे रूप काही वेगळीच होते. मुख्य पूजे आधीची साडी नेसून तयार होणारी, अजून फारशी सजावट न केलेली ती देवी अगदी आपल्यातली वाटत होती.
लहानपणी सकाळच्या झोपेची गुंगी डोळ्यावर असताना नुकतीच अंघोळ केलेली आई पूजा करता करता उठवायला यायची. तिचे धुतलेले केस तिने वर बांधलेले असायचे. ती जवळ आली की तिच्या साडीचा धुवट वास मन भरून टाकायचा. मायेने डोक्यावरून हात फिरवत ती एक श्लोक म्हणायची. "हिमनगनंदिनी त्रिपुरसुंदरी, हेरंबजननी अंतरी... " खूप प्रसन्न जाग यायची.
समोरची देवी तशीच वाटत होती - पहाटेच्या सुस्नात आईसारखी.

हळूहळू देवळात गर्दी वाढू लागली होती. देवीची मूर्ती फुलादागिन्यांनी सजू लागली होती. रांगेकडे लक्ष ठेवणारे देवळातले लोक गर्दीला पुढे ढकलत होते. कोणी भाविक तेवढ्या गर्दीत साष्टांग नमस्कार घालत होते. बाया मुलांची डोकी टेकवत होत्या. देवीची ओटी भरत होत्या. पुजारी देवीपुढे रेंगाळणाऱ्या बायकांना ओरडून पुढे जायला सांगत होते. आता देवीचा गाभारा पुजारयांनी पूर्ण भरला होता. देवळातला एक बुवा येऊन आम्हाला खेकसून बाहेर जायला सांगत होता. त्या ठिकाणी बसण्याची सवलत बहुतेक आता संपली होती. निमूटपणे बायका मागच्या मंडपात जात होत्या.
लौकिक असा नमस्कार न करताच मी देवळाच्या बाहेर आले होते. पहाटेच्या वेळी मिळालेल्या त्या सुंदर अनुभवानंतर आता कुठल्या सोपस्काराची गरजही वाटत नव्हती. आम्ही सगळे देवळाच्या बाहेर पडलो. गप्पांना सुरुवात झाली. सकाळी सकाळीच देवळाबाहेर एक जख्ख म्हातारी आशेने येणारया जाणारयाकडे पहात होती. तिला प्रेमाने तिचे देणे देऊन आम्ही तलावाकडे चालू लागलो होतो.

- सोनाली सुहास बेंद्रे 

Sunday, January 11, 2015

आजी आजोबा

सोसायटी मधल्या कट्ट्यावर एक आजी व आजोबांची जोडी रोज बसलेली असायची. आजोबा नव्वद च्या पुढचे आणि आजी देखील  मागोमाग असाव्यात. दोघेही उंचेपुरे आणि गोरेपान होते. आजोबांच्या अंगावर नेहमी पांढरा शुभ्र सदरा-पायजमा आणि बारा महिने स्वेटर मफलर असायचा. डोक्यावर खादीची टोपी असायची. तर आजीही नाजूक फुलांच्या पांढर्‍या स्वच्छ साडीत प्रसन्न वाटायच्या. त्यांचा संसार खूप आनंदात आणि समाधानाने  वाटचाल झालेला वाटायचा .

उन्ह उतरली की दोघेही सावकाशीने चालत घरातून निघायचे. आजोबा हातातील काठी टेकत, रोजच्याच पायाखालच्या रस्त्याचा नव्याने अंदाज घ्यायचे. तर खांद्यावरून पदर घेतलेल्या आजी सावलीसारख्या आजोबांच्या मागून निवांत चालत असायच्या. रस्त्याचा आणि गाड्यांचा अंदाज घेण्याची जबाबदारी आजोबांची असावी. लांबून येणारी गाडी दिसली की आजोबा आधी आडवा हात करून आजीला थांबवायचे. मग दोघे एकमेकांचा हात धरून कडेला उभे राहायचे. गाडी जाइतोवर लुकलुकत्या डोळ्यांनी पहात राहायचे. गाडी गेली की परत जोडी पुढे निघायची. जवळपास पाव किलोमीटरवर असलेला कट्टा गाठायला त्यांना अशाने बर्‍यापैकी वेळ लागत असावा.
पण तिथे येउन बसणे हा त्यांचा मोठाच विरंगुळा असावा. येणाऱ्या जाणाऱ्या  बरोबर  कधी गप्पा, मुलांचे खेळ बघणे यात ते रंगून जायचे.

रोज संध्याकाळी घरी जाताना त्या दोघांना तिथे बघण्याची मला आणि माझ्या लेकीलाही सवय झाली होती. ती रोज त्यांना हात करायची. कधीतरी आजोबाही त्यांचा थरथरता हात थोडा वर घ्यायचे. एकदा मात्र आम्ही आवर्जून त्यांच्याजवळ गेलो. प्रत्यक्षात ओळख नसल्यामुळे  असेल कदाचित पण आजोबा जरा गोंधळले. गाडी आल्यावर ते धरत तसा  त्यांनी आजींपुढे हात धरला आणि स्वतः पुढे झाले. जाड गोल चष्म्या मागच्या लुकलुकत्या  डोळ्यात प्रश्न होता - तू कोण? सुरकुत्यांच्या भारामुळे वाकलेल्या त्यांच्या हातामागे आजी अगदी  सुरक्षित व मजेत बसल्या होत्या. मला एकाचवेळी गंमतही वाटली आणि लहान मुलांविषयी वाटावी तशी मायाही. "आम्ही रोज तुम्हाला या वेळी पाहतो. मी याच सोसायटीत राहते." असं मी म्हणल्यावर
ते छान मोकळेपणाने हसले. माझ्या लेकीशी ते बोलत असताना मी त्यांना निरखून बघत होते. लक्ष्मी   नारायणाचा जोडा म्हणतात तो असाच काहीसा असावा असं काहीसं वाटत होतं.
त्यानंतर मात्र आम्ही कट्ट्या पाशी गाडी हळू करू लागलो. आजोबा आजीना हात करून त्यांचा हात वर दिसला की मग पुढे जाऊ लागलो.

पुढे काही दिवस कट्टा रिकामा दिसायचा. वेळ पुढे मागे होत असेल म्हणून जरा दुर्लक्ष केलं . पण मग राहवलं नाही तसं त्यांच्या घरी जाउन चौकशी केली. कळलं की ते काही दिवस दुसर्‍या  लेकाकडे गेले आहेत. येता जाता चुकल्या सारखं वाटत राहायचं.
शेवटी परवा एकदाचे आजोबा कट्ट्यावर दिसले. स्वेटर मफलर घालून एकटेच बसले होते. त्यांना एकटे पाहून चुकल्यासारखे वाटले . मनातले वाईट विचार बाजूला सारत जवळ जावून त्यांना विचारलं " किती दिवसांनी दिसताय ... आणि आजी कुठे आहेत ?" काही सेकंदानंतर ओळख पटली असावी असं वाटलं. म्हणाले - "तिची तब्बेत ठीक नसते जरा . चालवत नाही आता . बाहेर पडतच नाही ती एवढ्यात . मग मी एकटाच येतो ." मग थोडं थांबून म्हणाले "चालायचंच ... आता पुढे मागे व्हायचंच ."
मला हुरहूर लागून राहिली . लक्ष्मी शिवाय बसलेला नारायण एकटा वाटू लागला.

आता गाडीवरुन जाताना कधी हात केला तरी थांबून आजींची चौकशी करावी असं वाटत नाही . अज्ञानात सुख असावं असं वाटतं . मी स्वतःला सांगते की  आता आजोबा इथे एकटेच बसले असले तरी आजी घरी मुलां -नातवंडा बरोबर उबेत बसल्या असतील . संध्याकाळ गडद झाली की आजोबा सावकाश काठी टेकत घरी जातील आणि आजींच्या सोबतीने रमून जातील . हे सगळं असंच राहील .

- सोनाली सुहास बेंद्रे 

Sunday, August 04, 2013

Happy Friendship Day

"Hiii, मी एकडे मागच्याच बंगल्यात राहातो. मला कळलं की तू माझ्याच class मध्ये आहेस. म्हणलं चला भेटावं." ५ मिनिटं झाली याचं तोंड आपलं चालू आहे! हा मुलगा इतकी बडबड कशी काय करू शकतो? खरंतर मी त्याला ओळखतही नव्हते. काय तर म्हणे आत्तापर्यंत काय काय झालंय... कोणत्या assignments झाल्यात. सांगशील का? च्यायला काय माणूस आहे हा? एकतर उशिरा join झाला 2nd year ला. आणि आता माझ्या कामामध्ये येउन मला पिडतोय. त्याच्या बडबडीने माझं डोकं आता पार हललं होतं. पण याला त्याचं काहीच नाही. आता तर तो माझ्या आईशीही अगदी प्रेमाने संवाद साधत होता. मला तर वाटू लागलं होतं की हा अगदी रस्त्यावरच्या दगडाशीही छान बोलू शकेल. या आईलाही काही कळत नाही. चहा काय विचारतीये. म्हणे येत जा. माझा राग-राग होत होता नुस्ता.


"बरं का गं आता आपण एकत्रच जात जाऊ college ला. submission पण करू एकत्रच. व्वा, मला वाटलं नव्हतं मला अगदी घराच्याजवळ मैत्रीण मिळेल." माझ्या परवानगीशिवाय, त्यानं आता मला मैत्रीण केलं होतं स्वत:ची... तिळपापड. "तुझे अजून कोण friends आहेत? माझी पण ऒळख करून दे ना. छान group होइल आपला!"

अरे... काय गळ्यात पडतोय हा? घुसायलाच बघतोय जबरदस्ती माझ्या group मध्ये. मला आमचा ५ जणींचा गेल्या एक वर्षात छान जमलेला group आठवला. त्यात हा? No way ...
"हे बघ ..." मी त्याला म्हणलं, "आमचा आधीच group आहे. आणि आम्ही आमच्यामध्ये असं कोणालाही नाही घेत." तो बघतच बसला माझ्याकडे. काय तोंडावर बोलतीये ही. त्याला वाटलं असावं. मग बाय वगैरे करून गेलाच तो. नंतर आई ओरडली मला. .. फ़टकळ आहेस अगदी. किती चांगला मुलगा आहे तो.

.....

अशी ही आमची पहिली ओळख. आज 17 वर्ष झाली या गोष्टीला. पण अजूनही आठवलं की आम्ही अगदी खो-खो हसतो. आज तो माझा अगदी घट्ट मित्र आहे. घट्ट म्हणजे किती हे न सांगता येण्याजोगा. मधले सात समुद्र आणि college नंतरची वर्ष यातूनही आम्ही आमचं हे मैत्रीचं नातं छान जोपासलंय. आमच्या या मैत्रीवर त्याची बायको म्हणते, तुम्ही लोक धन्य आहात. म्हणजे तुम्ही एकमेकांच्या स्वप्नात वगैरे काय जाता अगं. इतकं कसं miss करता तुम्ही एकमेकांना!" तर मित्राचा phone झाल्यावर त्याच्याबद्दलची माझी अखंड बडबड ऐकून माझा नवरा म्हणतो ... तिकडे जाणार आहेस ना पुढच्या महिन्यात conference ला... मग ४ दिवस सुट्टी टाक आणि त्याच्याकडे राहा निवांत. पोटभर गप्पा मारा. मी बघतो लेकीचं सगळं...

.....
Happy Friendship Day मित्रा ...


- सोनाली सुहास बेंद्रे 

Tuesday, January 25, 2011

एक दिवस

सकाळी सकाळी ६ वाजता गाढ साखरझोपेतून उठवत असताना तिच्या छोट्याशा हातांनी तिने माझा हात घट्ट धरून ठेवला. "माझ्याजवळ बस ना ५ मिनिटं! कालची ती गोष्ट सांग ना गं ..."
पण मी मात्र तिला तसंच अर्ध्या झोपेतून उचललं आणि सरळ नेऊन पॉटीवर  ठेवलं. "चला आवरा आता. गोष्ट वगैरे काही नाही." तिचा चेहरा अगदी बारीक झाला. पेंगणाऱ्या तिला तसंच ठेवून मी माझ्या कामाला लागले.
"सकाळच्या गडबडीत गोष्टी काय सांगायच्या? आवरायचं सोडून काय बसून राहायचं का? एवढं कळायला नको का आता रोजच्या सवयीनं? ६ वर्षाची झाली की ती आता!"
तिचं आवरणं, शाळेची तयारी, डबा... घडयाळाच्या काट्याबरोबर माझं तोंडही चालू झालं. खरं तर तिच्या उशिरा उठण्यामुळे माझ्या वेळापत्रकाचे कसे १२ वाजलेत हे काही तिला सांगून कळणार होतं का?
तिला अजून घडयाळ कळत नाही हे माहीत असूनही नेहमीप्रमाणे मी धाक घातला, "ते बघ, तो मोठा काटा ८ वर येईपर्यंत दूध संपलं पाहिजे, काय?"
रिक्शावाले काका आले म्हणताच तिची धांदल उडाली. अंगापेक्षा बोंगा जास्त असलेलं शाळेचं दप्तर, टिफ़िन बॅग, पाळणाघराची बॅग असा दिवसभराचा संसार घेउन सकाळी पावणे-सातला ती निघालीदेखील. तिला शाळेच्या रिक्शामध्ये बसवताना, तिच्या हातातून माझा हात सोडवताना जाणवलंच की आता आपण थेट संध्याकाळीच भेटणार. क्षणभरच... पण मग लगेच पुढचा दिवस समोर दिसू लागला. मिटींग्जची एकामागून एक असलेली रांग, वाट पाहात असलेले निर्णय, कामांची न संपणारी मोठ्ठी यादी ...
सुपरवूमन असल्याच्या नादात दिवसभरात कामाचा अगदी फ़डशा पाडला. मिटींग्ज रंगल्या, सगळेच नाही पण कितीतरी निर्णय मार्गी लागले. लंच अवरमध्ये  नेहमीप्रमाणे विषय निघाले, मूल, अभ्यास, घर, ऑफिस कसं संभाळायचं हे सगळं?

"जमतं तसं सवयीनं, एकदा त्यात पडलं की मग काय?" मी हसून म्हणलं. हे बोलताना आत जाणवलेली बोच मी अगदी सराईतपणे लपवली.
दुपारी बोलावून बॉसने status विचारलं, कौतुकही केलं. कौतुकाच्या त्या नशेत २ नवीन जबाबदाऱ्या मी हसतच स्वीकारल्या. पुढचा दिवस कसा संपला काही कळलंच नाही.
आजूबाजूच्या मंडळींची चहा सिग्रेटला जाण्याची गडबड सुरू झाली तशी मी भानावर आले. घरचे वेध लागले. तिचा चेहरा डोळ्यापुढे येऊ लागला.
संध्याकाळच्या साडेसहाच्या बंपर टू बंपर ट्रॅफिकमधून एकीकडे सावकाश पण तरीही वेगात गाडी हाकताना वेळेचा अंदाज चुकल्याचं लक्षात येऊ लागलं. उशीर होऊ लागला तशी माझी घालमेल सुरू झाली. मग कोणी तिला घेऊ शकेल का याचे फोन सुरू झाले. नवरा, नातेवाईक, मैत्रिणी कोणालाच जमत नाही म्हणल्यावर सरळ पाळणाघरात फोन लावला. सगळी मुलं गेली आहेत, लवकर या हे ऐकून पोटात गोळा आला.
पाळणाघराच्या रिकाम्या अंगणात वॊचमन काकांबरोबर तोंड पाडून उभी असलेली एकटी ती मला दिसू लागली. उद्यापासून १० मिनिटं लवकरच निघायचं, मी परत एकदा निश्चय केला.

गाडीत बसल्या बसल्या तिने हुकूम सोडला, "ए घरी नाही ग जायचं... मला फ़िरायचंय तुझ्याबरोबर. आपण मज्जा करू. घरी गेलं की तू लगेच काम करत बसतेस. मग मला नाही आवडत ते."
झालं, मगाचा तिला भेटण्याआधीचा तो माझा दाटलेपणा कुठे गायबच झाला. "घरी चला, रविवारी बसू फ़िरत." मी दामटून तिला घरी आणलं.
घरात आल्या आल्या तिने माझ्यासाठी आणलेल्या गंमती दाखवायला सुरुवात केली. चॉकलेटची  चांदी, एक-दोन दगड, पाळणाघराच्या वाळूत सापडलेल्या बिया, सगळा खजिना तिनं माझ्यासमोर रिकामा केला. तोंडावर अगदी कुबेराचं धन लुटून आणल्याचा अविर्भाव. "पाहिलंस तुझ्यासाठी आहे." मी मोठ्या कृतज्ञेतेने तिच्याकडे पाहिले. "Thank you, मला इतक्या छान गंमती कधीच कोणी आणल्या नव्हत्या!... बरं आता होमवर्क  करुयात का?"
पुढच्या एक-दिड तासात थोडं गोडीनं - थोडं रागावून अभ्यास घेणं, धाक दाखवणं, वळण लावणं, जेवू घालणं अशी सगळी कामं मी efficiently उरकली. तिला T.V. पुढे बसवलं आणि माझा conference call चालू झाला. पण आज तिला T.V. नकोच होता. मग माझा फोनवर mute-unmute चा खेळ चालू झाला. तिला मध्येच येऊन काही सांगायचं होतं, स्वत: काढलेली चित्र दाखवायची होती. पण तिला कळलं बहुतेक की आईला आत्ताही वेळ नाही. माझा पुढचा call शांतपणे पार पडला.
तोवर ती पेंगुळली होती. बाजूला मगाची चित्रं, थोडे खडू पडले होते. माझ्यासाठी आणलेल्या टिकल्या, चांदया मी हरवू नये म्हणून एका डबीत भरून ती डबी माझ्या बॅगेत टाकली होती.
मी तिला जवळ घेतलं. अतिशय आसुसून ती माझ्या कुशीत शिरली. तिच्या चिमुकल्या हातांनी तिनं मला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यातून गरम पाणी तिच्या केसात पडलं. स्वत:चं आवडतं काम करायची धडपड, त्यापायी होणारी दगदग,तिची दिवसातून १० वेळा तरी होणारी आठवण, सतत सोबत करणारी काळजी आणि अपराधीपणा, सगळं अगदी साचून आलं.
बास. फ़ार झालं. आता ब्रेक घ्यायचा, आणि फ़क्त तिला वेळ दयायचा. हीच तर वर्ष आहेत. नंतर कदाचित तिला माझी गरजही उरणार नाही. बास... आता हा प्रोजेक्ट संपला की सांगून टाकायचं. मी परत एकदा ठरवलं... नेहमीप्रमाणेच.
मग अपराधीपणा जरा कमी झाला. पुढच्या दिवशीच्या कामांच्या विचारात मन बुडून गेलं. कधी डोळा लागला कळलंच नाही. जाग आली तेव्हा दुसरा दिवस सुरू झाला होता.

- सोनाली सुहास बेंद्रे